Saturday, March 19, 2016

राजगड ट्रेक


सस्नेह जय शिवराय                                                                       नितेश पाटील ९६३७१३८०३१
                                                                                                      nitesh715@gmail.com 
⛳शिवप्रेमी गडयात्री पालघर⛳
⛳राजगड गिरिभ्रमण (ट्रेक)१३मार्च२०१६⛳
सस्नेह जय शिवराय 
आयुष्य चौकटीचे ...... म्हणत होतो मी माझे.....
भेदून आज निघालो...... सह्याद्रीच्या वाटे.....
लेखातील फोटो सौजन्य :- शिवप्रेमीगडयात्री सदस्य 
          बहुतांशी माणसाचे आयुष्य एका चौकटीत चालू होते आणि संपतेही. काहींचा पसारा छोटा तर काहींचा मोठा... इतकंच. पण त्याही ऊपर जाऊन जे मातृभूमिसाठी, समाजासाठी, जनकल्याणासाठी जगतात त्यांची आणि त्यांचीच किर्ती अजरामर राहते, इतिहास त्याचा साक्षी आहे आणि त्यांचे पराक्रम, शौर्य, निष्ठा, निसर्ग-जनसामान्यांप्रती प्रेम याच्या संपर्कात जसजसा वर्तमान काळ येत जातो तसा तो अभिमानाने फुलत जात असतो हे सांगायची गरज नाही.
       काही गोष्टी करत असताना आपण मर्यादेत राहणंही गरजेचं असते. जिथे आपल्याला गिरिभ्रमण करणं जड जाते तिथला कण न् कण शौर्याने, पराक्रमाने गाजलेला आहे. ज्यांनी आपले चौकटीचे आयुष्य बाजूला सारून संपूर्ण राज्याचे सार असलेल्या दुर्ग सहाय्याने, निष्ठावंत मावळ्यांच्या साथीने धगधगत्या उन्हात, मुसळधार पावसात, मेघांच्या गरजण्यात, विजेच्या मारात, सैतानी आक्रमणास पिटाळून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हयात भर टिकवले. तो इतिहास आजही जिवंत आहे आणि राहील. त्या सर्वांस माझा शत शत मानाचा मुजरा.
      मला ज्ञात आहे हे बोलून, लिहून अथवा दाखवून साध्य होत नसते तर त्यासाठी त्या सर्वांनाच (गडकोट,शिवराय,मावळे) आधी समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पद्धतीच आचरण केलं पाहिजे...आज गडकोट गिरिभ्रमण करणाऱ्यांची संख्या भलतीच वाढताना दिसते आहे हि चांगली बाब आहे. पण सर्वच गिरिप्रेमींनी गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे. सगळ्या प्राचीन इतिहासाचं स्मरण, आणि त्याच बरोबर तो इतिहास जपणं, जागृत करणं हाच दुर्गभ्रमंतीचा मूळ उद्देश असला पाहिजे. शूर विरांचे सळसळते रक्त त्या मातीत मिसळले आहे आणि आजही तो गंध, तो थरार तेथे अनुभवता येतो. तो आपल्याला जाणवायला हवा तरच हि दुर्गयात्रा सुफळ पूर्ण होऊ शकते. अन्यथा निरर्थक पायपीट...!!!
प्रथम दर्शनी प्रेमात पडावा.... शिवरायांचा हरेक किल्ला .....
श्री राज्याची राजधानी प्रथम..... दुर्गाशिल्प राजगड किल्ला.....
        रतन गडानंतर आता बेत होता स्वराज्याची पहिली राजधानी राजगड गिरिभ्रमण(ट्रेक).गडावरील सखल भाग उंची ३९१२ फूट, अन तिथून बालेकिल्ला सरासरी ६०० फूट उंच. मार्चच्या रणरणत्या उन्हात हा आमचा पहिलाच ट्रेक. १२ मार्च २०१६ ची संध्याकाळ. एक एक करून सारे शिवप्रेमी गडयात्री जमले. पण बस काही येईना..!! सहाची वेळ देऊनही साडे आठ वाजेपर्यंत ताटकळत राहावं लागलं. नऊ वाजता धनसारहून श्री गणेशा करून निघालो. पालघरलाही पाच जण रेंगाळतच बसले होते. त्यांना घेऊन प्रस्थान केले. मनोरला(मस्तान) पोहचून गाडीची तहान भागवली. आता ती रात्रभर न थांबता पाळणार होती. त्याचबरोबर सोबत घेतलेली बिर्यानीही तिथेच खाली उतरली. आम्ही कावलो होतो हे बहुदा तिला कळलं असावं. मग काय बसली पंगत..!! आणि केली सुरवात....मजबूत खाल्लं.. शिल्लक बिर्याणी सोबत घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला...सोबत फोटोग्राफर अंकुर राऊत आणि दोन DSLR. बाकीही होतेच म्हणा...आणि शंभरची नोट निवांत......
       पुढचा प्रवास म्हणाल तर ठाणे, एक्सप्रेस हायवे मार्गे पुणे. बसने आपला रस्ता धरला. मागच्या ट्रेकचा उजाळा करत प्रवासाची सुरवात झाली. ढोलकिनी ताल धरला, टाळही वाजू लागले. आणि पाहता पाहता बसचे रूपांतर एका संगीतमय मैफिलीत झाले. वेळ कसा निघून गेला तोही कळला नाही. अडीच वाजेपर्यंत मैफिल चालू राहिली. तदनंतर शिल्लक बिर्याणी हाणली...आणि टोपाला मोकळीक करून दिली. उगाच त्याला कशाला भार नाही का..?? असो.. आता मात्र पुढचा रस्ता ओळखीचा नव्हता. पुणे-सातारा हायवे वरचा शिवापूर टोल नाका सोडून नरसापुर फाट्यावरून उजवीकडे बस मार्गस्थ झाली होती. आम्ही चार,पाच जण सोडले तर बाकी सर्वांच्या पापन्यांनी आपापसात आलिंगन घेतलं होतं. GPS चालू केला आणि पुढचा प्रवास नरसापुर, अंबवणे, मार्गासणी येथे डावीकडे वळून साखरगावी पोहचलो तेथून पुन्हा डावीकडे वळून चिरमोडीहून सरळ राजगड पायथ्याशी गुंजवणे गावात. जिथे काळा रस्ता संपतो. पोहचता पोहचता पाच वाजले. आता झोपणे अशक्यच होते. बस ठरल्या वेळेत आली असती तर दोन तास झोप मिळाली असती हे मात्र नक्की....असो...
काळ्या सफेद रस्त्यांनी... 
सुरवात केली...
रात्रीस खेळ चाले... 
मिणमिणते दिवे वाटांनी...
सह्याद्रीच्या कुशीत... 
पायथ्याशी पोहचलो...
जागेच रान कधीचे... 
मळलेल्या रान वाटांनी...
          गुंजवणे गावात राहण्याची सोय आहे. महाराजांचा आसनस्थ सुरेख असा पुतळा आहे. समोरच सभामंडप आहे जिथे सत्तर ते ऐंशी माणसं आरामात विश्रांती घेऊ शकतात. आम्ही सुवेळा गार्डन (गुंजवणे) (प्रो.राहुल बांदल मो.७५०७४३२८९८,९४२२३०१५९६) येथे काही काळ विश्रांती, शरीर शुद्धी करून चहा नाश्ता आपोटून ओळखपरेड कडे वळलो. १... अमुल पाटील-वगुळसार(L), सुदेश मोरे-धनसार(FV), अंकुर राऊत-धनसार(FV), अजय भोईर-धनसार, अतुल घरत-धनसार, अच्युत मोरे-धनसार, गणेश घरत-सफाळे, सुशांत देसले-खारेकूरण, हितेश घरत-धनसार, निनाद पाटील-नांदगाव, स्नेहल राऊत-धनसार, विकास मोरे-टेंभोडे, अखिलेश मोरे-धनसार(MV), अभिनेष किणी-खारेकूरण, निखिल पाटील-पालघर, वैभव पाटील-सातपाटी, पियुष घरत- ऐरोली, हिमांशू राऊत-धनसार, मनीष मोरे- शिरगाव, अक्षय किणी-शिरगाव, प्रणित पाटील-नवली, जतीन मोरे-धनसार, सिद्धार्थ मोरे-धनसार, अमोल राऊत-धनसार, परेश राऊत-शिरगाव (LV)अन मी नितेश पाटील-धनसार(LV). अमूलने मार्गदर्शन केलं. सोबत वाट दाखविण्यासाठी वाटाड्या म्हणून गुंजवणेचे काका".  मागच्या वेळेस एकोनावीस जण होतो आता तब्बल सव्वीस जण. उत्साह वाढतोय हे मात्र नक्की.
भार डोईवर... माणसं जपण्याचा 
शिवसंस्काराची ज्योत... तेवत ठेवण्याचा...
         समूह जर वाढत असेल तर समूहाची जिम्मेदारीही वाढत असते त्याच बरोबर समूहात सामील होणाऱ्या प्रत्येकाची. इथे माझं या शब्दाला जागा नसलेलीच बरी, जे काही आहे ते आपलं. समूहाची व्याख्या सोपी असते. आपण स्वतः एक समूह असतो. माझं नाव हे त्या समूहाला दिलेलं नाव आहे. हात,पाय,कान,नाक,डोळे, ई. हे त्या समूहाचे सदस्य आहेत. आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियांची, अवयवांची नावं वेगवेगळी आहेत. प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. प्रत्येकाचं आपलं स्वतःच असं प्राविण्य आहे. नाकाचं कार्य कान करू शकत नाही. कानाच कार्य तोंड करू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे साऱ्याच अवयवांच कार्य कुशल आहे पण ते त्याच्या ठाई आणि त्याच्या कौशल्याने. ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये.
आम्हास असावा छंद... 
गडदुर्ग फिरण्याचा...
जिवंत आजही इतिहास... 
तो जाणण्याचा...
        प्रत्येकाजवळ आपली एक स्वतःची कला असते ती ओळखून वाढीस लावली पाहिजे तरच तुमचं आणि तुमच्याबरोबरच तुमच्या देहरुपी समूहाचं कल्याण होईल. तुम्ही तुमचं कौशल्य कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार करायला हवा. इंद्रियांशिवाय देह नाही आणि देहाशिवाय इंद्रिय नाहीत. किंमत दोहींना सारखीच. हे दोन्ही चुंबकीय क्षेत्र आहेत एक उत्तर आणि एक दक्षिण. जे एकमेकांत घट्ट रूतलेले असतात. म्हणून त्यांना किंमत असते आणि समूहालाही. काही चुका होत असतात पण त्या वेळीस मान्य करून पुन्हा होणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि शिवप्रेमीगडयात्री समूह निश्चितच फक्त देह नव्हे, माणूस नव्हे तर शिवरायांचा निष्ठावंत मावळा म्हणून जगेल याची मला खात्री आहे.
इंद्रीयावीन देह नाही..... देहावीण नाही मी .....
माझं म्हणून काय जगावं..... देहावीण जर व्यर्थ मी.....    
       सकाळ झाली. सात वाजता गड चढण्यास आम्ही सुरवात केली. सूर्यनारायनाच्या दिशेने प्रस्थान करत असलेली धरणी माता प्रकाशित झाली. आकाशात केशरी छटा पसरली... सोनपिवळी किरणे जसजसी गडावर पडु लागली तसा पिवळ्या गवताची चादर ओढलेला राजगड संधिप्रकाशातून बाहेर पडू लागला. त्याचं सौंदर्य खुलू लागलं. दोन तेजस्वी बिंब समोरासमोर उभे ठाकले होते. राजगडाचा तो त्रिशंकू पसारा आणि अभेद्य असा बालेकिल्ला पाहून बहुतेक सुर्यनारायनासही वाटलं असावं कि तो त्यास कवेत घेईल. म्हणूनच त्यांनी वरचा रस्ता धरला असावा. गडावर चढताना उजव्या अंगाला खाली डोंगराच्या डोंगर धुरताना दिसले. काही काळे राख झालेले. बरं त्या डोंगरावर फारशी झाडही नाहीत कि वणवा लागेल म्हणून...मला हे समजत नाही आपल्या पूर्वजांनी ज्या पाषाणावर बसून आपल्या घावांच दुखनं निरपुन काढलं, तिथं आम्ही विड्या विझवतो ..!! लाजा कशा नाही वाटत हो...!! 
अंगावर येते वाट.... 
मागे वळणार नाही.....
घेतला वसा सह्याद्रीचा..... 
सोडणार नाही.....
            एव्हाना आम्हीही पद्मावती माचीच्या बुरुजाखाली पायथ्याशी येऊन पोहचलो होतो. गुंजवणे गावातून गडावर तीन रस्ते जातात. पहिला गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने(सोंडेचा दरवाजा). दुसरा गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने(सुवेळा माची). तिसरा गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने(पद्मावती माची). हा मार्ग तसा सोपा. माचीच्या पायथ्यापासून ते चोर दारवाज्यापर्यंत काहीसा अवघड, अंगावर येणारा रस्ता. तसे अधे मधे लोखंडी गज सेवेसाठी तत्पर आहेतच. ऊन्हंहि आता वाढली होती. पण फारसा त्रास जाणवत नव्हता. हवेत गारवा होता आणि हे सह्याद्रीच न दिसणारं सौंदर्य मनाला भुरळ पाडत होतं. आमचे गडयात्री एक एक करून चोरदारावाज्यातून गडावर पोहचले न् आम्हीही. दरम्यान सकाळी साडे नऊच्या सुमारास आम्ही पोहचलो. उजव्या हातावरच वसलेला स्वराज्याचं प्रथम तोरण तोरणा आणि आम्ही सध्यस्तीत असलेला श्री राज्याची प्रथम राजधानी राजगड. ती इतिहासाची पानं पुन्यांदा समोर ठाकली, ते शौर्य,पराक्रम,निष्ठा ज्यांना शब्दात गणनं अशक्यच...!!
            चोर दरवाज्यापाशीच बस्तान घेऊन नास्ता उरकला. नेहमी प्रमाणेच ब्रेड, बटर, जॅम. तदनंतर गड फिरण्यास सूरवात केली. आपण जेव्हा समूहाबरोबर बाहेर पडतो त्यावेळेस शिस्तीच भान प्रत्येकालाच असलं पाहिजे. गिरिभ्रमण म्हणजे मजा मस्ती मुळीच नाही. किंव्हा दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर नाही. गिरिभ्रमण म्हणजे डोंगर चढण आहे, रान तुडवने आहे, स्वतःच अंथरून पांघरून पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडणे आहे, तिथे असतो भराट वारा, असाते कळा कळा तापणारं ऊन, त्या उन्हावर फुंकर घालणारी सह्याद्रीच्या कुशीतील मायाळू शीतल हवा, असतात मोकाट डोंगर दरे, इतिहासाच्या जिवंत खुणा, आणि बरच काही. पण हे साध्य करण्यासाठी केवळ उत्साह असून चालत नाही....ते आव्हान असतं जिद्दीला. पुरषार्थाला ..!!
वर्षे चारशे गेली न तुटले अजुनी बंध
सह्याद्री अजुनी त्या पराक्रमात धुंद....
इतिहास अजुनी तोच मानसं बदलली 
साक्ष आजही देते सह्याद्री शिवरायांची....
लाख संकटे झेलून आजही खंबीर उभे
तटा बुराजांचे किल्ले वैभव राष्ट्रांचे ....
सहज पेलली संकटे पळविले सैतान 
गड यात्रेत उजागर होते ते शौर्य महान ....
नाद गुंजतो आजही तेथे जय भवानी
साद घालतो शिवप्रेमी तो जय शिवाजी....
जय जय जय जय जय भवानी....
जय जय जय जय जय शिवाजी ....
..........नितेश पाटील
       राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही भग्न अवस्थेत शिल्लक आहेत. चोरदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आहे. तलावाच्याभिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. या तलावातील पाणी बारमाही असते. खोली नव्वद फूट असावी असा गावकऱ्यांचा कयास आहे, तलावाचे पाणि आटवण्याचा एकदा शासनाने निष्फळ प्रयत्न केला होता असे गावकरी सांगतात. तलावाच्या डाव्या अंगाने पुढे चालत गेले कि पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. आता दोन्ही भग्नावस्थेत आहेत. 
         नवीन सदर बांधण्याचं काम, तटबंदी दुरीस्तीचं काम गडावर चालू आहे. ते पाहून आम्हा साऱ्याच शिवप्रेमींना एक विशेष आनंद झाला. काहिका होईना ? काम चालू आहे हे महत्वाचं. सारे गडकिल्ले म्हणजे म्हणजे शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारी स्मारकेच आहेत ती जपली पाहिजेत. इतिहासातील अनेक घटनांचे ते साक्षीदार आहेत. महाराजांनी याच किल्याच्या आधारे हिंदवी स्वराज्य उभे केले. आणि या किल्ल्यांचे संवर्धन पुरातत्व विभागाकडून होत नाही याबद्दल गडकिलल्यांवर काम करणाऱ्या अनेक गडाप्रेमींनी सांस्कृतिक मंत्र्यांजवळ चिंता व्यक्त केली होती. गडकिल्यांचे हे महत्व आणि अस्मितेचा प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१५ मध्ये गड किल्ले संवर्धन समिती स्थापन केली. या संवर्धनाच्या कामात अनेक गडाप्रेमी व दुर्गप्रेमी यांचाही सहभाग अपेक्षित आहे. दुर्गप्रेमीकडून किल्यांचे हवे तसे त्यांच्या परीने संवर्धन केले जाते. पुरातत्व विभागाकडे सध्या मनुष्यबळ कमी आहे आणि गडांची संख्या खूप जास्त आहे.अश्या परिस्तिथीत संवर्धन करणाऱ्या उत्साही गड प्रेमींना या कार्यात सामावून घेण्याचा निर्णय गड किल्ले समितीने केला आहे. आणि त्याच उद्देशाने या वर्षीपासूनच महाराष्ट्र शासनातर्फे रायगड या महाराजांच्या द्वितीय राजधानीच्या किल्ल्यावर एक विशेष महोत्सव साजरा केला गेला आणि पुढेही केला जाईल. आणि या पाच दिवसाच्या कार्यक्रमात अनेक गडप्रेमी, इतिहासप्रेमी सहभागी झाले होते. आपल्या येथूनही सुदेश,परेश,निकेत,आशु सहभागी झाले होते. महत्वाचं म्हणजे किल्ल्यांचे जतन फक्त जागेवरच न होता ते लोकांच्या मनात देखील झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने किल्ल्यांचे संवर्धन होईल.
किल्ले रक्षणासी उभा..... अभेद्य बालेकिल्ला....
राजगडाचा मुकुटमनी.....अनिकेत तपस्वी योद्धा....
पुढे आम्ही बालेकिल्ल्याकडे कूच केली.यावर जाण्यासाठी एकच वाट असून ती पुर्वीय अंगाला आहे. पद्मावती माचीवरून एक सामान्य चढण पार करून आम्ही अश्या ठिकाणी पोहचलो कि जेथे डाव्या अंगास खोलच खोल अक्राळविक्राळ दरी आणि समोर उजव्या अंगास भिंतीसारखा कडा आहे. वर जाण्यासाठी या कड्यातून अत्यंत आबोडधोबड, कमी अधिक लांबी, रुंदीचे, उंचीचे पायंडे आहेत. हात धरण्यासाठी त्या कातळात खोबण्या केलेल्या आहेत. सरावलेल्या माणसां खेरीज इतरांना येथून फार जपून चढावे उतरावे लागते. आपणास सुरक्षा वाटावी म्हणून दरीच्या अंगाने लोखंडी गज मारले असले तरी भय वाटतच राहते. विशेषतः उतरताना...
        हो नाय करत आम्ही सारे बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. आणि एकच नाद गुंजला... "राजश्रिया विराजित" "सकळगुणमंडळीत" "प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी" "रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री" "छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की जय... आणि अंगावर सर्रर्रर्रर्रर्र करून काटा उभा राहिला. 
          चारशे वर्षांनंतरही त्या दोन अष्टकोनी बुरुजांमध्ये अभेद्य असे प्रवेशद्वार ठाण मांडून आजही दिमाखात उभे आहे... कोण जिगरीच काम...कसा बांधला असावा बालेकिल्ला...जिथे चढणंही सहज शक्य नाही... तिथे हि वास्तू कशी उभारली असणार...?? इथे एक प्रश्न आपण स्वतःशी नक्की करावा त्या शौर्यासमोर आपली औकात ती काय..??? शून्य आणि केवळ शून्यच...मिरवणं वेगळं आणि अंगी असणं वेगळं...
 अदृश्य ते रूप गोजिरे.... आपल्या सह्याद्रीचे......
 जिवंत अजुनी शौर्य इथले.....माझे रोजचे मरणे.....
        तसेच बालेकिल्ल्याचा दिशेने वर गेले कि उजव्या हातावर राजप्रसाद आणि पाली दरवाज्यासमोरच्या बाजूलाच मोठा वाडा होता.आता दोन्ही भग्नावस्थेत आहे काही पाण्याचे टाके हि आहेत. बालेकिल्ला मुळातच चाहुबाजूनी कडा तुटलेल्या उंच उंच अश्या खडकांवर असल्याने त्यास तशी तटबंदीची गरज नसावी.पण अधिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यशही तटबंदी करून माऱ्याचे बुरुज आहेत. याच्या माथ्यावर तसे फार मोठे मैदान नाही. तरीही वरची सर्व जाग घराठाणांनी आणि पाण्याच्या
टाक्यांनी व्यापली आहे. आणि ते अवशेष पाहता शिवकाळात येथे मोठया हावेल्या असल्याची खात्री होते. पद्मावती माचीप्रमाणे इथेही निवासवाडा, सदर व आणखीही मात्तबरांची घरं असल्याचा अंदाज येतो. बालेकिल्यावरून गडाची ठेव अगदी विमानाप्रमाणे दिसते. सुवेळा माची आणि संजीवनी माची हे दोन पंखच जणू. आणि ते विमान सिंहगडाकडे रोखलेले दिसते. राजगडावरून सिंहगड, तोरणा, रायगड असे बरेच किल्ले दृष्टीस पडतात. गडाची तटबंदीहि भलतीच आकर्षक दिसते. मन मोहून टाकणारी...
कृपा जगदंबेची.... आई भवानीची..... संग सोबत निष्ठावंत मावळ्यांची....
हे राज्य व्हावे हि तर श्री ची इच्छा.... शिव छत्रपतींनी जोडली माणसं निष्ठेची....
        सूर्यदेव डोईवर असतानाही घळीतून येणारा गार वारा सुखावत होता.आता आमची सवारी सुवेळा माचीकडे वळली. मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा 3 टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर चिलखती बुरुजाकडे घेऊन जाते.चिलखती बुरुजावर माकडांची वर्दी होती. इथून बालेकिल्ला जणू उंच उंच दगडांच्या रचलेल्या भिंतीवर सिंहासनाधिस्त झाला आहे.

         काही वेळ तिथे घालवून थोडी विश्रांती घेतली. तशी काही प्रमाणात साऱ्यांची दमछाक निघाली होती. माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी
चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात 3 मीटर व्यासाचे एक नेढे आढळते जसे रतन गडावर आहे त्याच प्रकारचे.
या खडकालाच 'हत्तीप्रस्तर'असेहि म्हणतात. म्हणजे सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्यावरून जर चिलखती बुरुजाकडे पहिले तर तो हत्ती असल्याचा भास होतो. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडन पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात आहे. राजगड नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांनी वेढलेला आहे.सुवेळा माचीच्या उजव्या अंगास त्या पर्वतीय कोंदणात नदीचं पात्र उन्हामध्ये तळपताना दिसते.

बाजू एक अशीही तशीही..... माझी कैक पटीने बरीही....
संस्काराचा खेळ सारा....समाधानात सुख जरी दुखःही....
         सूर्य माथ्यावरून खाली उतरण्यास सुरवात झाली, दुपारचा एक वाजला. सकाळी सात वाजेपासून आमची ऐतिहासिक वाटांवरून पायपीट चालू होती. थकवा जाणवला नाही पण पोटात कावळे मात्र कावले होते. आमच्यासाठी नाही पण निदान त्यांच्यासाठी आम्हाला भोजन करावं लागणार होते. अखेर आम्ही पुन्हा पद्मावती माचीचा रस्ता धरला. वाटेत आम्हाला बारा वर्षाचा होतकरू मुलगा भेटला. हातात एक गोन. त्यामधे ताक, पाणी, लिंबूसरबत हे सारं घेऊन वणवण करत हिंडत होता. आम्हालाही बराच आग्रह केला त्याने. कि तुम्ही निदान ताक तरी घ्यावं. मग आम्हीही त्याला सोबतच घेऊनच खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्याची चौकशी केली तेव्हा कळलं कि सातवीत शिकणारा अत्यंत हुशार ,मेहनती आणि जिद्दी मुलगा. दीपक नाव त्याचं. ज्याला राजगडाची खडा न खडा माहिती. पुढे मोठा पोलिस अधिकारी व्हाव हे त्याचे स्वप्न. सातवी मधे शिकत असूनहि रविवारी आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून पाणी, ताक, लींबु सरबत घेऊन पालिहून गडावर पायपीट करत येतो. जेणेकरून ते आपल्याकडून विकलं जाईल. रविवारची सुट्टी फळाला येईल, दोन पैसे खर्चासाठी सुटतील. तेवडीच आपल्या आईवडिलांना मदत होईल. खाण तशी माती म्हणतात ती अशी...विशेष म्हणजे आज त्यांच्या शाळेत गॅदरिंग. त्यात त्याने भाग घेतलेला. एक महाराजांचा पोवाडा, तर दुसरं खंडोबाचं गीत नृत्य. त्याचे वडील छोटेखानी शाहीर...बघा कसले संस्कार आहेत. नाहीतर आपल्याकडची मुलं...तुलना करा फक्त...बाकी आपण काहीही करू शकत नाही. मुळात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी..असो....आपल्या शिवप्रेमी गडयात्री समुहतर्फे त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.. आणि त्याच्या ह्या जिद्दीला मानाचा मुजरा

       दीपक आणि वाटाड्या काकांच्या संगतीनेच आम्ही जेवणाचा कार्यक्रम उरकला. पाककलेत समृद्ध असलेल्या तब्बल सव्वीस कुकनी जो स्वाद डब्यात बंदिस्त करून दिला होता त्याला मोकळीक दिली आणि उदराचा रस्ता दाखवला. त्या आस्वादानेच सारे तृप्त झाले. आता पावणेतीन वाजले होते. वेळ वाया घालवून चालणार नव्हतं. सर्वाना पुन्हा प्रस्तावित करण्यात आलं. गड आम्ही जरी चोर दरवाज्याने चढले असू तरी उतरतेवेळेस मात्र पाली दरवाज्याने उतरणार होतो.काकांना बस गुंजवनेहून पाली गावात आणण्यासाठी रवाना केले आणि आम्ही दीपक सोबत गडाची माहिती घेत पाली दरवाजा गाठला. तत्पूर्वी संजीवनी माची. संजीवनी माचीवर येण्यासाठी अळु दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग यादरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा 3 टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. या माचीला एकूण 19 बुरुज आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. वेळे अभावी संजीवनी माची वर जाणे जरी टाळले असले तरी दिपकचं मार्गदर्शन आणि माचीची भव्य उत्कृष्ट अशी ताटबंदीच भुरळ पडणारी आहे. पावसाळ्यात या गडाचं सौंदर्य डोळ्यात मावणार नाही हे मात्र नक्की.
      पाली दरवाज्यातून बालेकिल्ला, संजीवनी माची आणि तोरणा न्याहाळताना आपले पाय जागचे हालत नाहीत.त्यांना रेटून पुढे धकालावं लागतं. पालीगावात जाण्याचा मार्ग पाली दरवाजातून जातो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्या उतरण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत.पायर्यांची उंची दमछाक करणारी आहे. उरतावेळेस पहिल्या प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्‍यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवड्याआहेत. ते प्रवेशद्वार ओलांडून खाली 200 मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. गडाच्या प्रत्येक टप्प्यांवर केलेली प्रतिकाराची रचना तसेच प्रत्येक दरवाजा तसेच बुरुजाला मागाहून दिलेले दुहेरी संरक्षण हे राजगडच्या वास्तुंचे मह्त्वाचे वैशिष्ट्य! महाद्वाराच्या आत एक दुर्बोध शिलालेख दिसतो.
भरभक्कम कोंडिव्यूह रचना .... राजगड पाली द्वार.....
गज अंबारी सहित यावा.....दुहेरी संरक्षित भव्य द्वार....
        आमची मात्र उतरताना दमछाक झाली पालिमार्गाच्या मानाने गुंजवणे मार्ग सोईस्कर वाटला. पायथ्याशी उतरून मागे वळून पाहिलं तर अजूनही काहीतरी शेष राहिलंय अस वाटलं राजगडावर काहीतरी मिस केलंय.... नक्कीच तो हिरवा शालू नेसलेला राजगड.... सुवेळा संजीवनी माची....बालेकिल्ल्याच्या एकेरी रस्त्यावरून ओघळणारे पाणि आणि त्यातून तो सर करण्याचा थरार.... ओसंडून वाहणारा पद्मावती तलाव....असं बरंच काही. पायथ्याशी उतरलो कि एक अर्धा किमी रस्त्यावर वेथभर धुळीचा खस पडलेला आढळतो. गडावर दुरुस्तीचे काम चालू असल्याने वाहनांच्या आवागमनामुळे असेल पण त्या धुळीत चालताना सर्यांचाच पारा चढला होता. आम्ही सोडून बाकीहि शिवप्रेमी गडावर भरपूर होते. काही तर रात्री मुक्कामी देखील होते.
        खाली पायथ्याशी पाली गावात आमची बस येऊन थांबली होती.सारेच आसनस्थ झालो आणि पाच वाजता बसने परतीचा मार्ग धरला. मधेच पुण्यात गाडीची तहान आणि आमची चहाची तळप पूर्ण करून हो नाय करत करत दहा वाजता लोणावळ्यात जेवणासाठी थांबलो. जेवण होईस्तोवर मनिषने टाईमपास आणि कॉल्डड्रिंक्स आणली त्याचा आस्वाद घेऊन जेवण उरकलं. कोणाला घ्यायची त्याने चिक्की, चॉकलेट्स घेतली आणि पुन्हा अकरा वाजता बस मार्गस्थ झाली ती थेट घरीच येऊन थांबली. बसमध्येच नवीन सदस्यांचे अभिप्राय जाणून घेतले. एकंदरीतच सारे उत्साही, आनंदी होते. काही नवीन मुद्दे हि पुढे आले त्याचाही विचार पुढच्या ट्रेक ला निश्चितच केला जाईल. शेवटी चांगलं ते चांगलच असतं. माणसाने या जगात जर सुखात जगायचं असेल तर चांगले विचार, चांगले आचरण, आणि आहे त्यात समाधान मानून राहावे...
जगदंबेची कृपा.... आमचा छंद वेगळा....
व्हावे शिवचरित्राचे आचरण.... हाती ध्वज भगवा.....
         इतिहासकारांचे दुर्गप्रेमींना सांगणे आहे. इतिहास प्रकाश दीप आहे. उणेपुरे सर्व स्वच्छ दाखविणारा, काय त्याजले पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, हे आपलं आपणच ठरवायचे असते. " शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे ते तटाबुरुजांनी अनुभवलं असणार !
या तटाबुरजांना जर वाचा फुटली तर हे आपल्या कानी कुजबुजत...म्हणतील, "होय गड्यानो तो पवित्र आत्मा आम्ही कोणे एके काळी आमच्या अंगाखांद्यावर गाजविला आहे. याची देही ,याची डोळा अनुभवला आहे. आणि आजही तो इथे जिवंत आहे.
        किल्ले पाहणे मुळात पोरखेळ नाही. निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने जरी किल्ल्याकडे पाहायचं म्हंटल तरी अशी हि रोमहर्षक, अशी हि चैतन्यमय, असगी हि विसरून टाकणारी, अशी हि तरूणाईस हाक घालणारी स्मृतिस्थळे शोधून सापडायची नाहीत. किल्ल्यावरून दिसनारे सूर्योदय आणि सूर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहे. किल्ल्यावरून रात्री पडणारे नक्षत्र दर्शन, हा अवर्णनीय आनंद आहे. त्याची कशाचीच तुलना करता यायची नाही.
       संसारिक व्यापापासून मन मुक्त होतं. रणावनातील पशुपक्षांशी मैत्र जुळतं. स्वच्छ भराट वारा छातीत भरून घेतल्यानं आरोग्य आपला पत्ता विचारीत येतं. वाढतं वय तिथेच थांबतं. ते माघारी वळतं. पाच दहा वर्षांनी तरुण झालो आहोत असा साक्षात्कार होतो. नाना समस्यांची खच्चून भरलेल्या , कळंजून गेलेल्या जीवनातुन काही क्षण जरी बाजूस काढून जे ऐतिहासिक स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी जातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजे तरी काय वेगळं असतं ...!!
 कैसे बोलणे चालणे सलगी देणारे शिवराय कैसे
सह्याद्री तटा बुराजांनी अनुभवले शिवराय कैसे 
वाचा फुटावी तटा बुरुजांना येऊन कानी सांगावे
अंगा खांद्यावर खेळले तुमच्या ते शिवराय कैसे 
रोमहर्षक चैतन्यमय असे तटा बुराजांचे किल्ले 
स्मृतीस्थळानो जागेच तुम्ही सांगा शिवराय कैसे
अपूर्व दृश्य ठेउनी लक्ष असती  सूर्योदय सूर्यास्त 
रात्रीच्या उदरातील नक्षत्रानो सांगा शिवराय कैसे 
मैल तीनशे लांबीची पर्वत शृंखला असे सह्याद्री
साज साडे तीनशेकिल्ल्यानो सांगा शिवराय कैसे 
वखानते जनता सारी जरी गुणगौरविते त्यांसी 
परी वागते विपरीत नाही ओळखले शिवराय कैसे 
..........नितेश पाटील 
राजगडावरील आजही या तीन माच्या, बालेकिल्ला, बुरुज, भग्नावस्थेतील अवशेष शिवरायांची प्रेरणा देणारे स्पूर्तीचे जिवंत झरे आहेत.
आपला अभिप्राय नक्की कळवा....
|| जय शिवराय ||
आपल्याला राजगड पर्यटनाला लाख लाख शुभेच्छा
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com

Thursday, March 17, 2016

प्रतापगड मशाल महोत्सव

सस्नेह जय शिवराय                                                                               नितेश पाटील  ९६३७१३८०३१
प्रतापगड मशाल महोत्सव २०१५                                                                   १६/१७ .१०.२०१५
सस्नेह जय शिवराय
प्रतापगड मशालमहोत्सव शुक्रवार दि.१६.१०.१५
मंत्रमुग्ध करणारा देदिप्यमान सोहळा……

खरं सांगायच तर श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या पराक्रमाणे पावन झालेल्या गड किल्ल्यांवर फिरणे हे कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा माझ्यासाठी जास्तच .त्याच्या सानिध्यात गेल्यावर जर महाराजांचा ईतिहास तुम्हाला माहीत असेल ( नसेल तर महाराष्ट्रात जगणं सोडुन द्यावं ) तर अंगावर रोमांच( हातावरचा केस न केस त्या परमेश्वरास नमन करण्यासाठी ऊभा राहतो ) उभं राहील्या शिवाय राहणार नाही.महाराजांचा ईतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचे पराक्रम, त्यांच शासन… त्यांच्यासाठी, स्वराज्यासाठी वेळी मरणास तत्पर असणारे निस्वार्थी एकनिष्ठ १००स१ असे या मातीशी प्रामाणिक असणारे कैक मावळे, त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य , हे स्वराज्य व्हावे हि त्या काळी श्री ची ईच्छा होती. आणि त्यासाठी आपले सर्वस्व स्वराज्यासाठी अर्पण करणारा मंत्रमुग्ध होणारा समाज होता.आताही असेल पण फरक आहे आता श्रीला जान्हवीच्या मागे लावलयं.ते पाहण्यात समाज ईतका गुंग झालाय कि श्री ला ही काहिहि म्हणु लागले.समाज ईतका अधोगतीला का चालला हे कदाचीत मला सांगता येणार नाही .सण सोहळ्यांची दुर्दशा करुन टाकली.त्याला अपवाद असतात हे पारंपारीक, सांस्कृतीक,देदिप्यमान सोहळे.

  1. आज मीच लीहलेल्या काही ओळी ईथे नमुद करु ईच्छीतो

सण सोहळे

गाव एक अन् ऊत्सव अणेक
सण सोहळ्यांची का झाली दशा
कोणी केली त्यांची दुर्दशा...
प्रतिष्ठा मिरवणारी पिढी
राजकारण करणारी समाजप्रवृत्ती
असेल काही प्रमाणात मी ही...
सण म्हणजे करमणुक नाही
सण म्हणजे खेळ नाही
तुझा मोठा की माझा मोठा
तो काही घर बंगला नाही
आपापसात तु झगडत राहिला
चंगळवादि समाज वाढू लागला
का विसरला माणूस सणांचा
शुद्ध, सात्विक हेतू , मतितार्थ...
सज्जन समाज शोकात राहीला
दुर्जन समाज जोमात वाढला
जाण ती संस्कृतीची का धरु नये
स्पर्धेपायी पिढी ऊगा नासवू नये
अमुल्य अपुल्या सण, ऊत्सव, परंपरा 
अनादिकाळची प्रथा नासवू नये....
.............नितेश पाटील २९.९.१५
असो माझं हे असं होतं आपण कुठं होतो…..?
प्रतापगडाचा संक्षिप्त ईतिहास ……
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.


प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला ३५५ वर्षे पूर्ण झाली. प्रतापगड वासिनी जगदंबा आई भवानी मातेच्या मंदिराला ३५० वर्षे झाल्यापासून हा कार्यक्रम नवरात्रीमधील चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा पहिली माळ दोन वेळेस आल्यामुळे हा कार्यक्रम अश्वीन शुद्ध तृतीयेस मोठ्या ऊत्साहात , जल्लोशात,पारंपारीक ,सांस्कृतीक पध्दतीने पार पडला. गत वर्षीप्रमाणे यंदाही आम्हास मशाल प्रज्वलीत करण्याचा सहभाग मिळाला.धन्य जाहलो…यंदा आम्हा पालघर धनसारकरांची ऊपस्तीथी ऊल्लेखनियच होती.गतवर्षी दहा जण,त्याच्या आधी  पाच जण आणि यंदा तब्बल साठ जण…ज्या वर्षी पहील्यांदा पाच जण गेले होते त्यात सुदेश, जीतु आणि त्यांचे मित्र पण त्यांच अहोभाग्य म्हणजे महाराजांचा ईतीहास ज्यांनी जीवंत केला घराघरात, प्रत्येकाच्या ह्रुदयात वसवला ते महान व्यक्तीमत्व गडावर उपस्थीत होते...मी काय वर्णू त्यांना तो माझा घास नाही. आत्ताच त्यांना महाराष्ट्रभुषन म्हणुन सन्मानीत करण्यात आलं त्यानिमीत्ताने काही ओळी लीहल्या होत्या...

महाराष्ट्र भूषण " शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे)

मी काय वर्णावे त्यांसी साहित्यिकांचा सन्मान पुरंदरे
शिवनेरीच्या शिवरायांनी झपाटले ते पुरंदरे
भक्तिमार्गावर ज्ञानदीपचा प्रकाश  ते पुरंदरे
ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेले ते पुरंदरे
इतिहासातुन राष्ट्राचे शील शोधले ते पुरंदरे
शिवचरित्र एकमेव जीवितधेय्य साकारले ते पुरंदरे
शिवचरित्र लिहताना अखंड सावधान ते पुरंदरे
भूतकाळाचा अर्थ समजून इतिहास सांगणारे ते पुरंदरे
अंतकरणात कवी मोहरबंध गोंडेदार ते पुरंदरे
इतिहास संशोधन हे शास्त्र त्यांसी ते पुरंदरे
अंगाअंगावर रोमांच स्थापित करावे ते पुरंदरे
शिवसाक्ष पत्रासाठी प्रलयपाउस सहनारे ते पुरंदरे
भाषेच्या अंगातून अलगद ओसंडून जाणारे ते पुरंदरे
तपशीलांवर पकड़ ती भलतीच कडक ते पुरंदरे
शिवचरित्र आठवित पावले शोधत फिरले ते पुरंदरे
कालवस्त्रा दूर सारुन इतिहास दर्शन घडवणारे पुरंदरे
दिले आयुष्य मिळवले शिवचरित्र धन ते पुरंदरे
लोकशाहिला अत्यंत पोषक भूमिका देणारे पुरंदरे
किती निराशा,किती अपमान तरी न डगमगले ते पुरंदरे
अखेर महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित झाले ते बाबासाहेब पुरंदरे... 
नतमस्तक मी तया चरणी उदात्त उदार ते पुरंदरे 

… नितेश पटील २०.८.१५

समाज निच्छीतच जागृत असतो. कुणालातरी पुढाकार घ्यावा लागतो. पण तो पुठाकार घेत असताना मी पणाची जाणीव त्याच्या ह्रुदयात वास करता कामा नये. ती नव्हती अन् कधी राहणारही नाही जो महाराजांचा होईल तो तो जणतेचा निच्छितच होईल यात तिळमात्र शंका नाही. ते बिजच ईतकं कर्मप्रधान आहे की ते कुठेही उगवल्याशिवाय राहू शकत नाही. जे काही आहे ते आपलं तुम्हा आम्हा सर्वांच आहे. महाराजांचे गुणगाण आज सर्वच गातात पण त्यांचा आदर्श मात्र कुणी घेत नाहीत(८०%). हिच खरी शोकांतीका आहे. आमच्या बरोबर शिवप्रेमी येण्याच कारण म्हणजे महाराजांप्रती असलेली आस्था,प्रेम…आणि हो आमच्यात मी कोण असा कुणीच नाही खरतर हे सागांयची गरजच नाहीये. सारेच शिवप्रेमी महिला, पुरुष, युवक, युवती, त्याच बरोबर रीदान, श्लोक, आर्या,जीया हि तर पाच वर्षा आतील चिल्ली पिल्ली पण पुढची पिढी.....ते घडवन्याचं कार्य तुम्हा आम्हा सर्वानाच करणे आहे शेवटी ती तुमचं अणुकरण करुनच घडत असतात. जे पेराल तेच उगवत असतं... जीजाऊंनी शिवराय घडवले ते कलर टिव्ही पाहून नाही. माफ करा पण पुर्वि बाई गरोदर असताना शुरांची चरीत्र,ग्रंथ,वांगमय वाचीत होत्या. मुलांनवर संस्कार हे जीतके समाजात घडत असतात त्याच्याहुन अधीक आईच्या उदरात घडत असतात हे माझं ठाम मत आहे नव्हे तो माझा अनुभव आहे...आता बाईला टिव्ही सुटत नाही.आणि त्यात बाहेरच्या समाजात तमोगुणी, चंगळवादि माणसांची संख्या वाढली परीणामी प्रोडक्शन खराब.कुठल्याही समुहाबरोबर पहिल्यांदाच जात असाल आणि परतेपर्यंत जर अलीप्त राहत असाल तर कुठेतरी मी या शब्दाने जन्म घेतलाय हे निच्छित.. त्याचं तुम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.कसं आहे ना आंब्याच झाड सर्वाणांच माहीत आहे त्याला मोहोर येतो बहर येतो आंबे येतात सारं काही मजेत चाललेल असतं अचानक काही दिवसांनी त्या झाडावर दुसरं एक झाड दिसू लागतं. ते हि सुंदर साजेसं.त्यालाही फळं येतात ती आपण खातो.लहान जरी असली तीतकीच मधुर असतात ती.पण हळु हळु ते झाडावर आलेलं, मातीशी न जुळलेलं झाड आपलं वर्चस्व प्रस्तापीत करतं आणि पाहता पाहता आंब्याच्या झाडाच रुपांतर एका वेगळ्याच झाडात झालेलं असतं.कालांतराने त्याची मुळं जमीनीत नसल्या कारणाने तेही उद्वस्त होतं.तो स्वत्ःही शेष झाला आणि आंब्यालाही शेष केलं.आमच्या ईथे त्या झाडाला बटांगली अश्या नावाने संबोधतात. तात्पर्य काय तर कुणिही आपल्यावर वर्षस्व करता कामा नये परीणामी आपणही जाणार अन् तोही तुम्ही कृतज्ञशील असावं पण समेरचा निष्ठावान असेल तर ….महाराजांपाशी निष्ठावंत माणसं होती त्याला महत्वाचं कारण म्हणजे महाराज कृतज्ञशील होते,स्वतःसाठी ते जगलेच नाहीत जे काही ते सारं स्वराज्यासाठी… ईतिहास नव्याने सांगायची गरज नाही…..

आम्ही सारेजण संध्याकाळी ५.३० ला पायथ्याशी वाडा कुंभरोशी गावात विश्रांतीगृहापाशी पोहचलो. आनंद दादा (नेकदिल महाराजांचा निष्ठावंत मावळा) हि खाली आले होते. त्याचं वास्तव्य गडावरच असतं… त्यानी कार्यक्रमाची पुनःचा रुपरेषा सांगीतली नी आम्ही फ्रेश होउन ६च्या आसपास किल्ले प्रतापगडावर पोहचलो किल्ले प्रतापगडावर ३५५ मशाली तटबंदीला लावून त्या सज्ज झाल्या होत्या. आम्हीही शिवप्रताप बुरुजावर आकाशात नृत्य करण्यासाठी,अताषबाजी करण्यासाठी फटाके घेउन आलोच होतो.तत्पुर्वी सारेजण लगबगीने अंधार होण्याच्या

आधी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी थेट वर केदारेश्वर मंदिराच्या ऊजव्या बाजुस असणार्या हिरव्या उद्यानात गेलो.तो पर्यंत सुर्य ही अस्ताला गेला होता.महाराजांचा पुतळा पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे कूच केली मंदिरात प्रवेश करताच आपल्याला भवानीमातेची सालंक्रुत प्रसन्न मूर्ती दिसते. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली आहे या मूर्ती शेजारीच महराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव
मोहिते यांची तलवार ही दृष्टिस पडते.त्या मंदिराचा कळस आजही सव्वा किलो सोन्यानी त्याच थाटात नटलेला आहे. दर्शन घेऊन आम्हास जीतू आणि सुदेशने आप्पांची ओळख करुन दिली. प्रतापगडावरील सोहळा त्यांच्या देखरेखे खालीच होतो
नेहमी प्रमाणे प्रतापगड स्वराज्य ढोलपथक मंदिराबाहेरील प्रांगणात सुर धरु लागला.तुतारी,ढोल
ताशांचा आवाज गगणाला भिडू लागला.अंगा अंगात रोमांच प्रस्थापीत होऊ लागलं…!! चैतन्य ऊसळू लागलं…!!
खासे पंचवीस मावळे पायरयांच्या दुतर्फा उभे राहून मशाली पेटवल्या गेल्या. त्यात आम्हिच १६ जण होतो हि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट
होती.पेटत्या माशाली घेऊन आम्ही शिवप्रताप बुरुजाकडे धावले. सुरवातीला तोफेच्या गगणभेदि आवाजाने अवघा प्रतापगड परीसर दुमदुमून गेला ढोल ताशांनीही त्या अविस्मरणीय क्षणाचा साक्षी होण्यासाठी सर्वोच्च शिखर गाठलं . शिवप्रताप बुरुज ते भवानीमाता मंदिर या संपूर्ण तटबंदीला मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. सुरुवातीला त्यानंतर
“जय भवानी जय शिवराय”…..!!
“हर हर महादेव”….!!
” प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक , कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय “….!!!
या जयघोषाने गडकोट आसमंत दणाणून गेला. शिवप्रताप बुरजावरून यंदा प्रथमच भव्य प्रमाणात फटाक्याची अताषबाजीने आसमंती अग्णि नृत्य गजबजु लागलं.खाली खानाच्या कबरेतील मातीलाही घाम फुटावा असा देदिप्यमान सोहळा साजरा होत असताना फक्त साक्षीदारच नव्हे तर मशाल प्रज्वलीत करण्याचे अताषबाजी करणयाचे आम्हास भाग्य मिळाले.पुण्हा वर येउन अंगातील शिवसंचार ठोल ताशाच्या गजरात थीरकण्यास प्रोत्साहीत करत होता…
तदनंतर वेळ होती प्रसाद वाटण्याची. आई भवानीचा प्रसाद ( जेवण ) प्रत्येक भक्तापर्यंत आवडीनं गोडीनं पोहचवण्याच काम आम्हीही आवडीने करत होतो.शिवभक्ताचा उत्साह प्रत्येकाच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.गतवर्षीपेक्षा यंदा शिवभक्तांची संख्या बरयाच प्रमाणात वाढली होती.पुढेही वाढत राहील शंका नाही…ज्याने एकदा का सोहळा पाहिला तर त्याला पुन्हा त्याचा मोह आवरता येणार नाही हे निच्छित….गर्दि जशी ओसरु लागली तसा आम्हीही प्रसाद भक्षण करण्यास मंदिराच्या प्रांगणात जेवण घेउन बसलो. जीतु,अमोल,सुदेश,अंकुरआणि मी…बाकीच्यांच आधीच आटोपलं होतं आमचं संपेस्तोवर आनंद दादाही येउन आमच्यापाशी जेवणासाठी बसले…
आई भवानीची महाआरती नंतर गोंधळाला सुरवात होणार होती.तत्पुर्वी सांगली येथील कलाकारांनी हलगी वाद्याचे सादरीकरण केले.
एक नवीनच कला पाहण्यास मीळाली त्यानंतर छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला.त्यात ईतर
शिवप्रेमींबरोबर स्वास्तिक आणि धनसारकर समुहानी नवरात्रउत्सवात केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता चिन्ह देण्यात आलं ते सर्वांच्या वतीने जीतुने स्विकारलं.आपण काहीही समाजासाठी केल्याची समाजाकडून पावती मीळत असते.त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय स्वराज्याच्या प्रतापगडावरुन आला.असो…आपण आपलच कौतुक करणे म्हणजे अधोगतीला जाणं हा माझा सिधांत्त अाहे
गोंधळाला सुरवात झाली आणि पुन्हा अंगात एक वेगळच चैतन्य सळसळू लागलं..हे अनुभवावं लागतं …त्याचं शब्दात वर्णन मला जमतय की नाही ते ही मी सांगु शकत नाही..पण एका वेगळ्याच विश्वात आपण दंग झालेलो असतो.शिवकालीन जगाचा आभास कुठेतरी हावी झालेला असतो.आई अंबेचा गोंधळ हातात पेटत्या मशाली…मंत्रमुग्ध झालेला आई भवाणीचा प्रांगण.त्या प्रांगणात शिवप्रेमींची ओसंडून वाहणारी गर्दि…संबळाच्या ताळावर फीरकणारे पाय, आधुनीक युगाची जोड म्हणाल तर तो क्षण टिपण्यासाठी डोकावणारया मोबाईलरुपी नजरा….त्याचाही मनसोक्त आस्वाद घेउन परतीचा मार्ग धरला सकाळी महाबळेश्वरच्या निसर्गसानिध्यात जाण्याचे ठरले होते…पाय परतीच्या दिशेने निघन्यास ऊत्सुक नव्हते पण पर्याय नव्हता.
अशीच कृपा आम्हावर सदैव रहावी हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना….
शब्दात वर्णन करणं अशक्यच…खरं म्हणायचं झालं तर मला शब्द अपुरे पडतायेत किव्हा सुचत नाहीयेत म्हणा…
जगदंब……
जय शिवराय …..
..........नितेश पाटील
nitesh715@gmail.com
०९६३७१३८०३१

रतनगड ट्रेक

सस्नेह जय शिवराय                                                                       नितेश पाटील ९६३७१३८०३१
                                                                                                     nitesh715@gmail.com           
रतनगड पद भ्रमंती ट्रेक १.२.३ जानेवारी २०१६

         वर्ष कालच सरले...काय उरले....
                  कोण जगले... कोण उरले....
            खरंतर हा चिंतनाचा विषय आहे. या धावपळीच्या जगात ना कुणाला जगायला वेळ आहे ना कुणाला उरायला..!! स्पर्धेपाई आयुष्य गमावून बसलेत सारे. माणसातला माणूस विरळ झालाय.असो जसं करावं तसं भरावं म्हणतात ते योग्यच आहे.पण जगायचा निखळ आनंद घ्यायचा असेल तर माणसाने सह्याद्रीच्या पर्वतरागांचा कणखरपणा, सौम्यपणा अनुभवायला हवा. आपल्याला निसर्ग अगदी भरभरून देत असतो. त्या निसर्गाची बीजं सह्याद्रीच्या पठारात रोवलेली आहेत.आणि सह्याद्रीचा कल्पवृक्ष आजही तिथे खंबीरपणे उभा आहे.
             त्या सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारे "श्री शिवछत्रपती शिवराय" आणि स्वराज्यासाठी मरणास तत्पर असलेले "निष्ठावंत मावळे".बाकी माझी गणती कशातही नाही. आज माणूस म्हणवून घेण्याचीही लाज वाटावी अशी काही दुष्कृत्ये घडतात. आणि आपण कानाडोळा करतो. जोपर्यंत आपल्या वाट्याला ती 'झळ' येत नाही तोपर्यंत आपण मुकाट्याने ते बघत असतो. महाराज्यांच्या कीर्तीचे गुणगान करतो. पण त्या किर्तिमागचा संघर्ष मात्र आपण बाजूला ठेवतो. संघर्ष सारेच करतात हो..!!! पण तो स्वस्वार्थासाठी नसावा. शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर तीन प्रश्न स्वतःला विचारायला हवेत...१.आपण जन्माला का आलो..? २. आपण करतो काय..?? ३. आणि करायला पाहिजे काय...??? या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडली म्हणजे माणूस म्हणवून घेण्याचा आणि स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार आपसूकच येईल... आणि त्याच उत्तरात आपलं भवितव्य दडलेलं आहे हे हि एक निरंतर सत्य आहे.
  
  शोध तयाचा घेईन मी...
   सार्थकी जीवन लावीन मी...
   सह्याद्रीच्या सुप्त मनात...
   काय दडलंय पाहीन मी...
                .....नीतेश पाटील
असो......विषय भरकटत चालला बहुतेक...!!!! आपण मुद्यावर येऊ.
        रतनगडाला भेट देऊन तुम्ही सह्याद्रीचे कातळकडे, त्याचं रांगडं रूप, त्याचा राकटपणा अनुभवू शकता. अहमदनगरच्या पश्चिमेस अकोले तालुक्याच्या डोंगरदर्यानी समृद्ध असलेल्या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्गरत्नांमध्ये हा किल्ला वसलेला आहे.
          मागे भीमाशंकर आणि हरिशश्चंद्र गडावरील डोंगरयात्री समूहाबरोबर केलेला पदभ्रमंतीचा अनुभव मी ब्लॉगरुपाने सादर केला आहे. आता रतनगडाच्या पदभ्रमंतीचा खडतर पण उत्साहवर्धक असा प्रवास शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.
         हरिशश्चंद्र गडानंतर पुढचा ट्रेक रतनगड. तसा उत्साह हा होताच ..!!! आणि त्याचबरोबर आमच्या सोबत येणाऱ्यांची संख्याही वाढली होती. तत्पूर्वी रायगड महोत्सवही जवळ येऊन ठेपला होता. माहितीनुसार २५ डिसेंबर पासून कार्यक्रम चालू होणार अशी बातमी होती. जेव्हा आम्हाला रतनगड ट्रेकची तारीख कळली तेव्हा आमच्या पालघर समूहात थोडी द्विधा परिस्तिथी निर्माण झाली होती. तारीख होती १,२,३ जानेवारी २०१६ . साहजिकच रतनगड किंव्हा रायगड यापैकी एकाचीच निवड करावी लागणार होती. डोंगरयात्री समूहाशी चर्चा करून आम्ही सारेजण एका चर्चासत्रात बसून रतनगड ट्रेक ला जाण्याचा निर्णय घेतला...आता वेध लागले होते बरं..!! कोण येणार, कसे येणार आणि खर्च काय या साऱ्या चर्चेचं गुऱ्हाळ चालूच होतं.
          आम्ही जेव्हा हरिशश्चंद्र गडावरून परतीचा प्रवास केला तेव्हाच ठरवलं होत कि आम्ही धनसारहून गाडी करून पायथ्याशी पोहचणार आणि मुंबाईवाले मुंबईहून. दोन वेळेची दगदग पाहता हा निर्णय घेतला होता.१५ डिसेंबर २०१५ या दिवशी गाडीवरूनच काही शाब्दिक वाद समूहात निर्माण झाला. चूक कोणाची होती हा मुद्दा महत्वाचा असला तरी त्याचा परिणाम इतर सदस्यांवर अथवा समूहावर पडता कामा नये. वादग्रस्त मुद्दे कटाक्षाने टाळले पाहिजेत. समूह संचालक माणसं जोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात वादग्रस्त मुद्दे उपस्तीथ करून आपण आपल्या मजाकमस्तीची चरणसीमा गाठून विकोपाला नेऊ नये. पण आपण आत्मपरीक्षण केलं तर कळेल कि कुठलाही माणूस वादग्रस्त मुद्याकडे आणखीन जवळून पाहण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मग तो वाद शिगेला पोहचतो. आणि आम्ही समूहात अगदी नवखे असल्यामुळे (दोन ट्रेक ने माणूस अनुभवी होत नाही) सुदेशने आम्हा सार्यांनाच म्हणजे पालघर समूहात जे होते त्यांना समूहातून बाहेर काढलं. त्याच आम्ही साऱ्यांनीच समर्थन केलं. तसं करतांना डोंगरयात्री समूहाच्या जुन्या, जाणत्या, अनुभवी ट्रेकर्स सुजाताईस (सुजाता शिरगावकर ) कल्पना दिली होती कि कितीही वाद झाले तरी पालघर समूह डोंगरयात्री समूहासोबतच ट्रेक करेल. 
        वाद हा शेवटी वादच..!! त्याने कुणाचाही भलं होत नाही. तो नको इतकीच आमची प्रांजळ इच्छा होती.त्यानंतर आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत वैयक्तिक त्यांच्या संपर्कात राहीलो पण शेवटी त्यांनी ट्रेक रद्द झाल्याचं कळवलं. आमची तयारी चालूच होती. रायगड जाणे रद्द करून आम्ही रतानगडाची सैर करण्याचं ठरवलं होतं आणि आम्ही ती कुठल्याही परिस्थिती करणार हे निश्चित होतं...


        संघर्ष कुणाचा , बळी कुणाचा......
        फांद्यांच्या संघर्ष, वणवा रानाचा...
        जळती मशाली, कडे पठारी......
        शिवतेज तळपते, प्रकाशते सह्याद्री
        मशाल सह्याद्रीची, निष्ठा मावळ्यांची ....
        स्वराज्य तुझे, ठेव जान त्याची....
                   ............नितेश पाटील
        भिंतीवरील कागदाप्रमाणे पृथ्वी आणखीन एका वर्षाने लहान झाली होती. नवीन वर्षाची सुरवात आणि रतनगड पदभ्रमंतीचा दौरा... तो सुखद प्रवास अनुभवन्यासाठी आम्ही हो नाही करता करता रसद घेऊन १८ जण सुसज्ज झालो. डोंगरयात्रींची अनुभवी टीम यावेळेस आमच्या सोबत नव्हती हे कुठेतरी मनाला बोचत होतं. पण घेतला वसा सोडता येत नाही तशीच काहीशी गत आमची होती. त्यातच परेशचा(स्वामी) भाऊ जेजेला आजारामुळे भरती होता. त्याचही अगदी निघायच्या वेळेस रद्द झालं होतं. ट्रेक करणं सोपं काम नसतं त्याला अनुभवाची जोड लागते. पण अमुल आणि सुशांत असल्यामुळे काहीस हायसं वाटलं. ( डोंगरयात्रीचे जुने सदस्य) दोन तवेरा आणि आम्ही ड्रायवर पकडून वीस जण. रतनगडाची काहीच कल्पना नव्हती. अगदी रस्ताही माहित नव्हता. फक्त रतनवाडीस जाऊन वर जात येत इतकं काय ते ठाऊक......

                  घेतला वसा सोडू नये ....
                            पाठ फिरवून जाऊ नये....
                                     संघर्षा विन जीवन नाही...
                                               संधी मिळते सोडू नये...
                                              ..............नितेश पाटील 

              आम्ही धनसारहून अकरा साडे अकराच्या दरम्यान 'आई भवानीचे' दर्शन घेऊन 'महाराजांना वंदन' आणि 'गणपती बाप्पा मोरयाचा' गजर करून  रतनवाडीकडे रवाना झालो. आम्ही निवांत आणि आम्हाला वाहून नेण्याचं चोख काम ड्रायवर दादा राकेश आणि प्रदीप यांच्या हातात होतं.आम्हीही मागे टाकलेल्या ट्रेकचा उजाळा करत, गुलाबी थंडीचा आस्वाद घेत एका ओढीने गाडीत बसलो होतो. रस्ता म्हणाल तर पालघर, वाडा, खोडाला, घोटी, भांडरदारा मार्गे रतनवाडी पोहचणार होतो. वेळ रात्रीची होती. आम्ही खोडाला पार करून आठेक किलोमीटर पुढे असू. रात्रीचे दीड वाजले होते. कड्याक्याची थंडी, वाडा ते घोटी भयाण जंगल, एकेरी सुनसान मार्ग, नागमोडी वळणांचा, एका बाजूस खोल दरी, गाड्यांची वर्दळ तर सोडाच पण साधी एकही गाडी रस्त्याने फिरकत नव्हती. दूरवर वस्तीही नजरेस पडत नव्हती. अश्या भयाण काळोख्या रात्री भर रस्त्यात एक "बाई"....!!!! हो एक "बाई" डोईवर पदर, नाकात साजेशी नथ, चमचमणारी साडी एका लयीत रस्त्याच्या कडेला नजरेस पडली... आम्ही सारे अचंबित झालो. आणि कयास बांधू लागलो. विशेष म्हणजे त्या बाईने अश्या सुनसान रस्त्यावर गाडी येत असताना पाहून मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही.....

          तो विषय धरूनच आता चहाच्या चुस्कीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही घोटी सोडून पुढे जिथे भांडरदारा जाण्यासाठी घोटी-सिन्नर मार्ग सोडावा लागतो तिथे पावने तीनच्या सुमारास पोहचलो. रात्रभर सारखा प्रवास करायचा म्हंटल्यावर अधून मधून "चहा" तर हवाच... त्यात गुलाबी थंडी असली कि काही औरच मजा...!!! दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला लागल्या.सारे उतरले. अंगात हुडहुडी होती. त्या बाईला पाहून काही प्रमाणात कमी झाली होती म्हणा..!! पण चर्चा मात्र तीच तुम्ही पहिली का अन तुम्ही पहिली का ?? साऱ्यांनीच पहिली म्हंटल्यावर ते भूत नसावं हे मात्र निश्चित झालं पण एकट्याला दिसली असती तर त्यालाही वेड्यातच काढलं असतं. त्यात श्यामला दिसली नव्हती म्हंटल अरे बाबा तुझे 'ग्रह' चांगले म्हणून तुला नाही दिसली आमचे नबळे म्हणून आम्हाला दिसली...बाकी काय म्हणणार..??? असो... चहा बनवण्यासाठी अमोलने घरून आणलेली हिरवीगार गवताची जुडी (गवतीचहा) दिली आणि "फक्कड चहा" बनवून घेतला सोबत पारले जी अहाहा..!!! काय आस्वाद होता. गुलाबी थंडी... हातात चहाचा वाफाळत असलेला सुगंधी कप.... वरून पारले जी ....क्या बात..?? दिल खुश झाला भाई....
          त्याची चव जिभेवर तशीच ठेऊन पुढे आमचे चालक भांडरदारा , रतनवाडीकडे रवाना झाले. घोटी पासून भंडारदरा(शेंडी) २५ किमी तर भंडारदरा(शेंडी) पासून रतनवाडी २२ किमी अंतरावर आहे. पुढे आमच्या गाड्या भांडरदारा धरणाच्या वेशीवर शेंडी गावात येऊन थांबल्या. रस्त्याची गफलत होऊ नये म्हणून आम्ही तिथे असणाऱ्या एका रखवालदारास विचारून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण अस होतं कि रतनवाडीस जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तिथून दोन रस्ते जातात एक भांडरदारा धरणाजवळून मुतखेळ मार्गे रतनवाडी हा मार्ग जवळचा. आणि दुसरा भांडरदारा धरणाला पूर्ण वळसा घालून पांजरे ,सांप्रद मार्गे रतनवाडी हा मार्ग लांबचा म्हणाल तर दुप्पट.. पण त्या रखवालदाराच्या अनाडी पणामुळे त्यानी आम्हाला दुसरा मार्ग सुचवला. बरं आम्हाला माहित नसल्यामुळे आम्हीही गाड्या त्याच मार्गे वळवल्या. भंडारदर्‍याच्या खोर्‍यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रदचा फाटा आहे. आणि रस्त्यात तशी वस्ती कमी. रात्रीची वेळ.. कुणी माणूसही दिसत नव्हता शेवटी एक जीपवाला नजरेस पडला त्याला विचारून आम्ही सांप्रद मार्गे वळलो. कारण हा रस्ता सरळ घाटघर डॅम कडे जातो.

       साम्रद गावातूनही रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे.साधारण दीड दोन तासात 'रतनगडच्या खुटय़ाला' वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दऱ्या आपले लक्षवेधून घेतात. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गानेही आपण गडामधे प्रवेश करतो.
अखेरीस सारं काही निपटून आम्ही रतन वाडीत पहाटे साडे पाचच्या सुमारास पोहचलो.अमृतेश्वर मंदिरापाशी. आणि हुश्श केलं. खरंतर त्या रखवालदाराची चीड येऊन राहिली होती. एक तास आमचा वाया गेला होता. थंडीनेही पहाटे समयी शिखर गाठलं होतं. हुडहूडत गाड्यावरच्या बॅगा काढल्या तोपर्यंत वर राहायची सोय आहे कि नाही, दुसऱ्या दिवशी खाली उतरल्यानंतर जेवणाची सोय हे सारं काही चौकशी करून नक्की केलं वरही जेवणाची सोय होऊ शकते शनिवारी, रविवारी दोन दिवस.पण आम्ही रसद घेऊन आलो होतो म्हणून काही काळजी नव्हतीच.

     आता अमृतेश्वर देवस्थान ने विसाव्यासाठी बनवलेल्या शेड मध्ये अंग टाकून सकाळ होईपर्यंत निवांत थंडीचा आस्वाद घेत विश्रांती घेतली.
सातच्या ठोक्याला सारे उठले. शरीरशुद्धी करून चहाचा घोट घेतला. राशन जे एका गोनीत होतं ते आपापसात वाटून घेतलं, सुशांतने त्याची सॅग खाली करून त्यात जवळपास तीस किलोच्या आसपास समान भरलं. अनुभवी ट्रेकर्स म्हणून आम्हीही ते भरू दिलं. तदनंतर ओळख परेड.अमृतेश्वराच दर्शन उद्या येऊन करणार होतो. सारे एका वर्तुळाकार कक्षेत आले अमूलने मार्ग दर्शन करून ओळखिस प्रारंभ केला. आम्ही सारे नवीन असल्यामुळे वाटेकरू सोबत घेण्याचे ठरविले आणि घेतलेही. सोपान झडे हे ट्रेकर्सना वाट दाखवतात त्यांचे दुसरे बंधू नाथू झडे (मो.नं. 8308037394) हे गडावर शनीवार,रविवार दोन दिवस चहा पाणी जेवणाचं छोटेखानी गुहेत उपहार गृह चालवितात आणि तिसरे भाऊ रामदास झडे ( मो.नं.9325325463)हे पायथ्याशी रतन वाडीत उपहार गृह चालवितात .सांगायचं म्हणजे कसलीही गैरसोय नाही.....

           आता आपण ओळख परेड कडे वळू. "१...निकेत राऊत-नांदगाव, अजय भोईर-धनसार,अतुल घरत-धनसार, अंकुर राऊत-धनसार, श्याम पाटील-धनसार, गणेश घरत-सफाळे, सुशांत देसले-खरेकूरण, चेतन राऊत-धनसार, निनाद पाटील-नांदगाव, राकेश भोईर-धनसार, सुदेश मोरे-धनसार, अमुल पाटील-वगुळसार, अखिलेश मोरे-धनसार, आशितोष मोरे-वाशी, जतीन मोरे-धनसार, सिद्धार्थ मोरे-धनसार, अमोल राऊत-धनसार, अन मी नितेश पाटील-धनसार सोबत वाट दाखविण्यासाठी सोपान झडे-रतन वाडी" असे आम्ही १९जण गडावर चढण्यास सज्ज झालो. सर्वात पुढे सोपान मामांसोबत सुदेश आणि अंकुर...अन शेवटी अमोल आणि अमुल बाकी आमचा मधला कार्यक्रम...
     ८.४५ च्या सुमारास आम्ही गावातून पुढे गावाची वेस ओलांडून रानवाटा पायदळी तुडवत चालू लागलो. समृद्ध अश्या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड उठून दिसत होता. खडकाला आरपार भगदाड असलेले ठिकाण जे नेढा म्हणून ओळखले ते नजरेस पडत होते. रतन गडाचा खुटाही खिळून बसलेला दिसत होता. भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी मी माझ्या आयुष्यातली तिसरी आणि रतन गडच्या पहिल्या ट्रेकसाठी सज्ज आणि उत्सुक होतो. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करणार नाही हे जाणूनच होतो. पण इच्छा, शारिरीक क्षमता, सोबत असणाऱ्या मित्रांची साथ आणि सारं नियोजन व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच असणार यात काही शंका नव्हती. प्रवरेच्या डाव्या अंगाने आम्ही ते सौंदर्य डोळ्यात साठवत पुढे सरत एक दहा मिनिटातच नदी पार करून उजव्या अंगाला गेलो. पाठ बांधाऱ्याच काम चालू असल्यामुळे प्रवरा नदीच्या ओढ्यातील पाणी अडवले आहे याच ओढ्याला पार करून त्याच्या शेजारून आमचा ट्रेक चालू झाला. वरून राजाची यंदा कृपा तशी कमीच झाली त्याचेच पडसाद उमटलेले दिसले. आता वरुण राजाची कृपा कि आपली ते हि सांगणं कठीणच आहे म्हणा असो .....

             गडाच्या वाटेवर काही ठिकाणी दगडावर वर जाण्याच्या दिशेने "बाणाचे चिन्ह" दिसून येतात. त्यामुळे गडयात्रींची वाट सोईस्कर होते. थोडा वेळ अजून चालल्यावर मुख्य ओढ्याला अजून एक ओढा येऊन मिळतो या ठिकाणाहून सरळ जाणाऱ्या वाटेने वर चढावे उजवीकडची वाट पकडू नये. सरळ वाटेने वर जाताना थोडी दमझाक होते कारण चढण अंगावरची आहे. परंतु नीट चालल्यास साधारण २०-२५ मिनिटात एक छोट पठार लागत. आणि आपण गडाच्या मध्यात पोहोचल्याचा आभास होतो.आम्ही रमत गंमत इथवर उत्सहात चढलो होतो. आता वेळ होती नाश्त्याची. "ब्रेड, बटर आणि जाम.." पदभ्रमंतीत सर्वात सोईस्कर नास्ता....१० चा ठोका पडला होता. शरीरशुद्धीने आधीच रिकामी उदर आणि त्यातच गडवाट... सारेच कावले होते.सार्यांनी नाश्ता केला सोबत अतुलने आणलेल्या कोथिंबीर वड्यांचा सार्यांनी आस्वाद घेऊन तोंडभरून तृप्त मनाने कौतुक केलं. बहुउतांशी नवखे ट्रेकर्स असल्यामुळे इथे एक अनुचित प्रकार घडला. काय तो सांगत नाही..!!!! पण पुढच्या वेळेस त्याची खबरदारी घ्यावी असं आश्वस्त केलं. इथे थोडावेळ आराम करून परत मार्गस्थ व्हायचं होतं. तितक्यात सुरुंग लाऊन पाषाण फोडावा तसा आवाज आसमंतात, सह्याद्रीच्या कातळकड्यात घुमू लागला. आम्ही सारे सैरवैर होऊन पाहू लागलो. तोच समोरच गडाच्या वरच्या बाजूने "दरड" कोसळून खाली येताना दिसली. आणि सह्याद्रीच्या दरीत मातीचा धुराळा हवेत सोडून काही क्षणातच विरून गेली. त्यात आम्ही पठारावर होतो हे आमचं नशीब..!!! एक कधीही न पाहिलेली अनुभूती आम्हा सर्वाना आली. पुढे आम्ही वरच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो.
          

     पुढची वाट गर्द झाडींची, दगडी गोट्यांची सांगड घालून करवायची होती. सुशांतची सॅग आलटून पालटून वर चढवताना दमछाक होत होती. पण रसद वर नेणं गरजेचं होतं. बाकी पर्याय नव्हता. सुशांत कानदुखीने त्रस्त होता. त्याला ते ओझं घेऊन वर चढणं तितकसं परवडणारं नव्हतं. श्याम आणि सुदेशने ते काम केलं.एक १५ ते २० मिनीटं पुढे गेल्यावर सरळ मार्गावर एक उजव्या अंगाला फाटा फुटतो तो "रतनगडाचा" रस्ता. समोर जाणारी वाट "हरिशश्चंद्र" गडाकडे जाते. इथे वाट चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. दाट उंच झाडांचं जंगल असल्यामुळे बाहेरच काहीच नजरेस पडत नाही. वनविभागाचा फलक आहे पण वारा पावसाची झळ पोहचून पार गंजून गेला आहे. आणि काही नकट्या अक्षर वीरांनी, संस्कारहीन भुलचटानी त्यावर आपल्या मर्तीका कोरल्या आहेत. हे जे कोणी दळभद्री असतात त्यांच्या प्रियसिना "सार्वजनिक मालमत्ता" घोषित करायला हवी...!!! मोकळा द्रीघ श्वास घेत, कधी धापा टाकत तर कधी क्षणभर विश्रांतीचे क्षण मोजत पुढे मार्गस्थ होत होतो. मजल दरमजल करत पुढे सरकत होतो. सोबत संगमनेर कॉलेजची मुलं, मुली ट्रेनींग साठी सोबतीला (सॅग) काहीही न घेता गडाची वाट चढत होते.खरतर त्यांना रिकामी पाहून हेवाही वाटत होता आणि हि अशी कसली ट्रेनिंग हा प्रश्नही मनात घर करत होता. दमछाक करत, मधेच थांबत आम्ही शिढीपाशी पोहचलो.
समोरचं दृश्य मनात धडकी भरणारं होतं. "तीस फुटाची पहिली शिढी, दुसरीही तेवढीच असावी, तिसरी बारा फुटाशी
लगभग". तीन शिड्या पार केल्या कि तुम्ही गडावर पोहचले थेट गणेश दरवाज्यातून पुढे जाता येत. पण आमचा LV आणि काही जण अजूनही शिढीपाशी पोहचले नव्हते. गणेशला थोडासा त्रास जाणवत होता. साहजिकच ती चढण पार करण म्हणजे सोपं काम नव्हतं. तिथे कुणालाही त्रास होऊ शकतो. काही वेळाने तेही सारे आले आणि आम्ही एक एक करून शिड्यांच्या पायऱ्या चढून गणेश दरवाजा ओलांडला. गणेश दरवाज्यात गणेशाची सुंदर शिल्पे दिसतात आणि समोर वसलेला अथांग भांडरदारा आणि गाव पाहून पूर्ण थकवा निघून जातो.गणेश दरवाज्यातून वर चढताना काही कातळ कड्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत. त्या पाहून त्या शूरांस वंदन केल्याखेरीज पुढे जाता येत नाही. ते "शौर्य" तुम्ही आम्ही काय वंदाव.... जेथे आपली चढण्याची दमछाक निघते तिथे हे अविश्वसनीय पण अढळ असं "शौर्य" त्या वीरांनी पेरून ठेवलंय त्यांना "मानाचा मुजरा".


 गडावर माणसं फार नाही पण बर्यापैकीच होती. गडावर तीन गुहा आहेत यातील दोन वापरात आहेत. एका गुहेत "रत्नाबाईच" मंदिर आहे. "कळसूबाई", "रत्नाबाई" आणि "कात्राबाई" या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे. बाकी आई जगदंबाच जाणे....
          
      दुसऱ्या गुहेत नाथू मामाचं छोटेखानी उपहार गृह आहे पोहचता क्षणी मामांन कडून लिम्बु सरबताच रसपान केलं आणि तीसऱ्या गुहेला लोखंडी ग्रील लावले आहेत. या गुहेत साधारण पंचवीस ते तीस लोक झोपू शकतात. म्हणजेच आमच्या पूर्वजांनी आमची नैसर्गिक पंचतारांकित सोय करून ठेवली होती म्हणायची..!!
आम्ही तिथेच आमचं बस्तान मांडल. तिथून दिसणारा देखावा नयनात मावत नव्हता. ते सह्याद्रीच मनाला भुरळ पडणार सुशोभीत दृश्य न्याहाळण्यात सारे असे काही धुंद झाले जणू "स्वर्गातील अप्सराच" तिथे अवतरीत झाली आहे. डाव्या अंगाला उतुंग अस कळसूबाईच शिखर, उजव्या अंगाला आजोबाची पर्वतरांग, समोर खाली भव्य असा भांडरदारा, त्याच्या शेजारी वसलेली कौलारू घर, त्याच्या पाण्यात दिसणारा "पर्वतांनी नेसलेला हिरवागार शालु" , वरून नभाची छबी आणि त्याच्या वर पाठरावरती लावलेल्या पवनचक्क्या जणू वारा घालत होत्या. साधारण चारशे वर्षं जुना असा हा गड "छत्रपतींच्या" आवडत्या गडांपैकी एक का होता याची प्रचीती येथे येते.नायनात ते "सौंदर्य" साठवल्यानंतर क्लिक मारायला सऱ्यांचेच मोबाईल पुढे सरसावले त्यात "शंभराची नोट" (माझा मोबाईल, ती गम्मत भीमाशंकर ब्लॉग मधे वाचायला मिळेल)हि मागे राहिली नाही म्हणा....!!!!
जेवणाची वेळ झाली होती. एकचा ठोका पार होऊन पुढे अर्ध्यावर गेला होता. मग फ्रेश होऊन सार्यांनी
आपापले डबे काढून पोटपूजा केली, काही वेळ विश्रांती आणि साडे तीनच्या दरम्यान गड भ्रमतींसाठी निघालो.आम्हाला गड दाखविण्यासाठी खडा न खडा माहिती असलेली झडे मामांची अवघ्या दहा वर्षाची मुलं सज्ज होती.एकाच नाव "वसंत". आताच्या वसंताप्रमाणेच आगाऊ अवेळी


उधळणारा. दुसऱ्याच नाव "शिवलिंग". खरंतर या नावातच भोळेपणा आहे. आणि त्याला साजेसा असा तो. ते दोघंही पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे... गुहेतून खाली उतरून उजव्या अंगाला प्रमुख दरवाजा आहे. त्या दरवाज्यावर आपल्याला अंजनी सुताची शिल्पे व ईतर देवतांची शिल्पे पहावयास मिळतात. या दरवाज्याला हनुमान दरवाजा म्हणूनही संभोधले जाते त्यातून वर गेलात कि गडावर वास्तव्यासाठी असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे काही अवशेष दिसून येतात.
पूर्वेस खाली कडेलोट पॉईंट आहे जिथे पूर्वी पाणी साठविण्यासाठी चार फूट अर्धवर्तुळाकार खंदक खोदले आहे. समोरच भव्य असा कुलंग गड, अलंग गड ,आजोबाचा डोंगर त्या पर्वत रांगा पाहून थक्क व्हायला होतं.
पाषाणाचा साज चढलेले उंच खोल असे नक्षीदार कडे जी आजोबाची भिंत म्हणून ओळखली जाते. ती निसर्गाची किमया पाहून आपलं अस्तित्व काय ..?? हा प्रश्न मनात तरळून जातो.आणि उत्तर येतं "शून्य" केवळ "शून्य"..!!
तिथूनच पश्चिमेस पाहिलं कि "राणीचा हुडा" (भग्न बुरूज) नजरेस पडतो. त्या टेहाळणी बुरुजावरुन तुम्ही सकळ
सह्याद्रीच रुपडं डोळ्यात साठवू शकता.तिथून उजव्या अंगाला खाली उतरले कि तीन पाण्याचे टाके आहेत. वरून गढूळ दिसणार पण आत नितळ आणि शीत असं पाणि त्यामध्ये आहे. हे पाणी पिण्याजोगं नाही.मग पुढे आम्ही कूच करतो "चोर दरवाज्याकडे". या दरवाज्याचे वैशिष्ठ म्हणजे यातून उंबरा ओलांडला कि थेट हजार फूट खाली दरीत. जेथे खाली बघण्याची आपली हिम्मत होत नाही तेथे मावळ्यांनी शौर्य गाजवलं आहे. ते स्मरताना अंग पूर्णतः शहारून जातं.
पुढे रात्री जेवणासाठी लागणारं सरपान गोळा करत जिथे पाण्याचे बारा टाके आहेत त्या दिशेने कूच केली.
काही रिकामी तर काही पाण्याने भरलेले असे. पुढेच एक "अंधार कोथडीत" पाण्याचे टाके आहेत. अंधार कोठी व त्यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे. पण हाती मोबाईलच्या उजेडात त्या आखूड जागेतून आत शिरताना मनातील भीती आणि उत्सुकता यात उत्सुकतेपोटी आत शिरण्याचं बळ प्राप्त होते.
विशेष म्हणजे त्या आखूड जागेतून चटकन मागे फिरणं शक्य होत नाही .आपण कल्पनाही करू शकत नाही त्या पद्धतीचे ते तळे निर्मीले आहे. जसे काही अवाढव्य अश्या उंच पाषाण हृदयी पर्वताचे उदर. त्यात असंख्य झऱ्यांचा स्रोत वर्षानुवर्षे आजातायगत चालू आहे आणि प्राणिजनांची तहान भागवत आहे.
आता नेढे पार करून आम्ही कल्याण दरवाज्यापाशी पोहचणार होतो.
तत्पूर्वी गडाच्या पश्चिमेकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे, सांधण दरी,सांप्रद गाव पाहून भान हरपून जाते. आणि तोंडातून शब्द नकळत बाहेर पडतात "अप्रतिम" "केवळ अप्रतिम"..!! निसर्गाच्या सौंदर्येपुढे कुणीही लुब्ध होईल असं ते निसर्गरम्य दृश्य. ज्याला सह्याद्रीच वेड आहे तो इथे ठार वेडा झाल्याखेरीज राहूच शकत नाही...तेथुन काही अंतरावरच रस्त्याच्या शेजारीच आम्हाला शिवलिंगाने शिवलिंग दाखवली त्याचं दर्शन घेऊन नेढ्याकडे चालू लागतो. इथेही अंगावरची चढण आहे .नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना "नेढे" आहे.त्या बोगद्यात तुम्ही उभे राहिले कि वाऱ्याचा थरार आणि रूप तुम्हाला अनुभवायला मिळेल.जर पाय घट्ट रोवले नाहीत तर...आता जशी समाजात काही माणसं हवेत उडतात आणि हवा संपली कि दिसेनाशी होतात तशी हवा आपल्याला उडवण्यासाठी तिथे प्रतिक्षण तत्पर असते...
      समोरच डाव्या हातावर "रतन गडाचा खुंटा", त्याच्यामागे कळसूबाईच शिखर आणि खाली अभेद्य असा कल्याण दरवाजा. नेढेतून खाली उतरताना थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
मागून सुसाट येणारा वारा आपली परीक्षा बघत असतो. आपणास परतीच्या मार्गासाठी यथेच्छ ढकलत असतो.त्याच्याशी संग जोडून आम्ही "कल्याण दरवाज्यापाशी" पोहचलो.
यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात. पूर्ण पाषाणात कोरलेल्या कतलपायऱ्या
या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला अविश्वसनीय दरवाजा आहे. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत. खरतर हे सारं तुम्ही डोळ्यात साठवू शकता. त्यासाठी शब्द तोकडे पडतात. त्याचं मूल्यमापन हि अशक्य आहे. सांगायचं झालं तर सह्याद्रीची तुलना नाहीच....
आता गडावरील शेवटचं ठिकाण म्हणजे प्रवरेचा उगम. आमचे छोटे वाटाडे वाट दाखवत पुढे आणि आम्ही आमच्या डोईच्या वर उंच गवतात त्यांच्या मागे प्रवरेच्या उगम स्थानी पोहचलो.कमी प्रजन्यवृष्टी मुळे पाण्याचा हलकाचा झरा चालू होता. येथील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्याजोगं आहे. अतिशय थंड आणि स्वच्छ. एकंदरीत पाहता गडावर एप्रिल पर्यंत पुरेल इतकं पाणी आहे. बाजूलाच शिवाची पिंड आहे तिचं दर्शन घेऊन आम्ही सारे गुहेत परतलो. मावळतीची वेळ येऊन ठेपली होती.नभात केशरी रंग उधळला होता.त्यातच आमचे शिवप्रेमी मावळे हातात भगवा ध्वज घेऊन ती क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद करत होती.
त्या मंत्रमुग्ध वातावरणात आम्ही गुहेत चूल मांडली.सूर्य नारायणाने आपल्या परंपरेनुसार वर्षा वर्षानुसार सुरु
असलेले त्याचे मंगलकार्य आज हि यथेच्छ पार पाडत धरणी माईची रजा घेतली. एक दिवसाचाचा संसार सह्याद्रीच्या कुशीत आम्ही थाटला होता. गडावर इतरही शिवप्रेमी आपापली राहण्याची सोय करू लागले होते. शेफ अशितोषणे सार्यांना कामं वाटून दिली. जेवण बनवण्याची जय्यत तयारी सुरु झाली. मी हि "मशाल" बनवण्यात गुंग झालो. माणूस हा मिश्राहारी प्राणी असला तरी माणसाला मांसाहार करण्यात जास्त रस असतो हे नाकारता येणार नाही. ज्याने त्याची चव चाखली तो खासकरून बाहेर पडला कि ....असो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे शेळी कितीही भुकेली असली तरी शहाकारीच खाणार. आणि वाघ कितीही भुकेला असला तरी मांसाहारच. दीड महिना उपाशी राहिला तरी रक्तच.... माणसाचं तसं नाही. त्याला दोन्हीपण चालतात. असो तर मेनू होता भात आणि सुके बोंबील. आशुने चटपटीत भाजी बनवली होती. मशाली पेटून उठल्या होत्या. त्यातच समोरचं दृश्य मनाला भुरळ पडणार होतं. हवेत गारवा होता पण थंडी मात्र तितकी नव्हती.रतनवाडी आणि शेजारच्या गावातील टीमटीमनारे दिवे गावाची वेस दाखवत होते. तारे, चांदण्या नभाची शोभा वाढवत होते. प्रवरेच्या पाण्यात त्याची छबी उमटली होती. आणि आम्ही टीमटीमनाऱ्या नयनांनी ते सौंदर्य ह्रुदयात साठवत होतो.खरंतर खऱ्या अर्थाने जगत होतो.
           माझा आणि अतुलचा मार्गशिष असल्यामुळे आमची डिश नाथू मामांच्या उपहार गृहातून घेतली.वरण, भात, भाजी, तांदळाची हातभाकरी, ठेचा अप्रतिम जेवण. बाकी सर्यानीही बोंबलाची भाजी, भाजलेले सुके बोंबील, भात यावर ताव मारून आपली क्षुधा मनमुराद भागवली. मग कॅम्प फायर आणि सुरेल गाण्यांची मैफिल सजली. "महाराष्ट्र गीताने" सुशांतने मैफिलीला सुरवात केली. जतीन, अखिलने कांगोचा ताबा घेतला आणि बाकी साऱ्यांनीच त्यांना साथ दिली आणि त्या सुरेल मैफिलीने सारा परिसर हर्षुन गीतमग्न झाला.नंतर काही गुफेमध्ये तर काही बाहेर झोपी गेले.

     सकाळ झाली काल अस्त झालेला सूर्य आज पुन्हा नवं आशेचे सकारात्मक किरण सोबत घेऊन येणार.काल उधळलेला केशरी रंग आजही आसमंती त्याच रुबाबात उधळला सारे मिनमिनते दिवे शांत झाले. आम्ही एका आतुरतेने सूर्य नारायणाची वाट पाहू लागलो.गडद असलेला केशरी रंग वितळू लागला अन आजोबाच्या भिंतीवरून डोंगराआडून सोनेरी सिंहासनावर सोनपिवळ्या ज्वाला घेऊन रवी आसमंती झळकला. दाही दिशा
प्रकाशित झाल्या. काय ते तेज, का तो रुबाब, जणू..
 कोंदणात सह्याद्रीच्या
 शिवसूर्य जन्माला
 केशरी छटा आसमंती 
  दाही धुंद प्रकाशाल्या    
.......नितेश पाटील                                                       

हे असे संस्मरणीय क्षण ह्रुदयात साठवून आज रतन गडास वंदन करून परतीचा प्रवास साधायचा होता. तत्पूर्वी शरीरशुद्धी, मामाच्या उपहारगृहातील फक्कड चहा आणि आशुने बनविलेले अप्रतिम पॊहे यांचा आस्वाद घेऊन, आलो त्याच मार्गाने परतीचा प्रवास.सारं आटपताना दहा वाजले. खाली उतरतानाही सोबत वसंत आणि शिवलिंग होते. आम्ही निघायच्या आधी काही ट्रेकर्स गडावर पोहचले होते. तशी शनिवार रविवार वर्दळ
चालूच असते गडावर. आजकाल लोकांचा ओढा या दिशेने वाढलेला दिसतो. पण त्याचा गैर वापर कुणी करू
नये इतकंच वाटत. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आपण त्यापुढे आपलं सर्वस्व बहाल करण्या इतपत. सौंदर्याचे, प्रेमाचे अन प्रेमजीवनाचे धडे गिरवायचे ते त्याच्याकडून. तो कोणत्याच गोष्टींचा गर्व बाळगत नाही, जे आहे ते इतरांत वाटून टाकायचं, त्याला फक्त द्यायचं माहित आहे. पण त्याच्याही मर्यादा काही तो आखून आहेच. नाहीतर माणूस नावाचा प्राणी लुट करयाला तत्परच असतो म्हणा... असो....
सोबत बऱ्याच अविस्मरणीय आठवणी घेऊन खाली उतरत होतो. गाण्यांचे सुरेल सूर घुमवत रस्त्याने वेळीस थांबून नाचत गात सारे गावाच्या वेशीवर प्रवरेच्या
बंदीस्त पात्रात डुबकी मारण्यास सज्ज झाले. गार पाण्याची तमा न बाळगता साऱ्यांनीच इथे अंघोळी केल्या. . कळत नाही असा माणूस या पृथ्वीतलावर नाही. खयायचं तर सार्यांनाच कळतं. मग कुठे काय करायचं याच भान सार्यांनाच असायला हवं......
खाली जाऊन अमृतेश्वराच दर्शन जे घ्यायचं होतं. पण इथेही एक अनुचित प्रकार घडला. आपण ट्रेक करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. साऱ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. काही गोष्टी ज्याच्या त्यालाच कळायला हव्यात
अर्धाच्या सुमारास खाली पोहचलो. ड्रायवर दादाची भेट घेतली आणि आधी सॅग वर बांधून घेतल्या मग दर्शनास गेलो. "अमृतेश्वराच हेमाडपंथी मंदिर" कलाकुसरीचा अनोखा नमुना. रतनवाडीमधे हे अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. त्याआधी पहिले दृष्टीस पडते पुष्कर्मी तीर्थ. याच्या चौबाजूनी सतरा छोट्या नक्षीदार देवळांची निर्मिती केलेली आहे चारही दिशांना चार आणि दर्शानीस एक त्यात वेगवेगळे देवांच्या मुर्त्या स्तिथ आहेत. मधोमध आसपास पंचवीस फूट खोलवर पाणी दिसते. मंदिराच्या परिसरातली हि "पुष्कर्णी तिर्थ" कायम लक्षात राहन्यासारखी. अमृतेश्वर मंदिराच्या प्रथम दर्शनी दोन नंदी एका मागोमाग स्तिथ आहेत. अप्रतिम कलाकृती असलेलं हे मंदिर वेगवेगळ्या शिल्पानी सुशोभित आहे. गाभार्यात पाच फूट खोल खाली अमृतेश्वराची पिंड आहे, सभामंडपात सहा नक्षीदार खांबांची अप्रतिम कलाकृती पहावयास मिळते. झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर. रतनवाडी ह्या गावी एक अतिशय सुंदर असे हेमाड पंथी शंकराचे मंदीर स्तिथ आहे.
आमची हि पहिलीच ट्रेक अगदी सुरळीत आणि धमाल मजेत पार पडली होती. मागील ट्रेकपेक्षा या ट्रेकचा उत्साह वेगळाच आणि आनंददायी होता. डोंगरयात्री समूह असता तर मजा द्विगुणित झाली असती. पण असो नाही त्याला तुम्ही काय करणार ना ? पुढच्या फेरी जाऊ कि सोबतीनं... पण तोवर निरंतर ग्रुपला काहीतरी नाव देणं गरजेचं होतं. आणि सर्वानुमते रतन गडाच्या पायथ्याशी अमृतेश्वराच्या साक्षीने "शिवप्रेमी गडयात्री" असं आमच्या समूहाचं नामकरण झालं.
तदनंतर रामदास मामांच्या घरी गावरान चविष्ट जेवणाचा (गडावर होतं त्याच पद्धतीच)आस्वाद घेऊन अडीच वाजता परतीची वाट धरली. यावेळेस मात्र "भांडरदारा धरणाजवळून" निघालो जो जवळचा मार्ग आहे. धरणापाशी थांबून काही क्लिक मारले आणि मागे सोडलेल्या गडावरच्या आठवणी आणि पुढच्या ट्रेक समंधीत चर्चा करत सव्वा सहाच्या सुमारास चहाची चुस्की घेण्यासाठी खोडाळ्यात थांबलो. तिथेच सार्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं. पहिलाच ट्रेक असला तरी सारे निसर्गाचे ते सौंदर्य आणि चमत्कारिक रूप जेंव्हा पाहण्यास मिळते तेंव्हा स्वतःचे भान कसे हरपून जाते हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. तदनंतर लागलीच ट्रेकसाठी झालेला खर्च आणि शिल्लक रुपये याची विल्हेवाट करून ट्रेक संप्पन झाल्याचं घोषित करून पुन्हा परतीचा मार्ग धरून सुखरूप घरी पोहचले. पण सह्याद्रीची झिंग मात्र तशीच होती आणि निरंतर रहावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
जगावं त्या धुंदीत मी
शिवप्रभूंच्या सह्याद्रीत
विनवीतो जगदंबेस मी
शिवरायांचा आश्रीत.....
.............नितेश पाटील 


आपला अभिप्राय नक्की कळवा....
|| जय शिवराय ||
आपल्याला रतन गड पर्यटनाला लाख लाख शुभेच्छा
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com

देवरूपा ट्रेक

ट्रेक देवरूपा हिमालय महात्म्यांचा सहवास मोठा दिव्य प्रत्यय घेऊया उंचावरती घर हिमाचे जाऊन तेथे पाहूया फुलझाडांच्या दऱ्यांमधून बहरलेल्...